खुशबू-ए-गुलजार, ‎गुलजार-ए-पंचम




गुलजार यानी काव्य-गीत लेखनाबरोबरच सिनेमातील बऱ्याच क्षेत्रात मुशाफिरी केली, कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन, त्या त्या विषयाला न्याय देऊन.  मासूम, चाची 420, चुपके चुपके, आनंद, खूबसूरत (रेखा) चे पटकथा-संवाद गुलजार यांचे.  क़ाफिया म्हणजे क़ाय हे समजून घ्यायचे असेल तर खूबसूरत मधील संवाद ऐकावेत. (रेखा लक्षात असेल, तिच्या तोंडी असलेले संवाद ???).  मेहबूब की मेहंदी चे संवाद संपूर्णसिंग कालरा यांचेच.  बंदिनी, काबुलीवाला, श्रीमान सत्यवादी चे सहाय्यक दिग्दर्शन, माचिस, घर, चतरन, किनारा, किताब, मौसम, आंधी, कोशिश, परिचय, अचानक अशा सिनेमांचे दिग्दर्शन गुलजार यांचे.  किनारा-किताब चे निर्माता गुलजार.  अर्थात  1963 सालच्या बंदिनी पासून इश्किया-हैदर-मिरझ्याचे गीतकार या नात्याने ते आपणास परिचीत आहेतच.

1975 साली प्रसन्न कपूर-हरिराम कपूर निर्मित, खुशबू या सिनेमाचे पटकथा-संवाद-गीतकार गुलजार यांची कामगिरी फार सुरेख तरीही हटके आहे.  प्रेक्षकाना हवे ते देणारा, त्यांचे लांगुलचालन करणारा एक गट असतो, आपल्याला क़ाय म्हणायचे आहे ते हटके सांगणारा एक गट असतो. दुसऱ्या गटात गर्दी फार कमी आहे, त्यात गुलजार, बिमल रॉय, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी आहेत. 

गुलजार-पंचम या मित्रानी मिळून जे संगीत निर्मिले आहे ते विलक्षण आहे.  राहुल देव बर्मन यांचे संगीत सिनेमाच्या/दिग्दर्शकाच्या/कथेच्या प्रकृती प्रमाणे होते.  हम किसीसे कम नही चा आर डी वेगळा, कारवाँ चा वेगळा, तसाच परिचय-किनारा-आंधी-खुशबू चा आर डी वेगळा.  गावातल्या नायिकेला (हेमा) उद्या नायकाच्या (जितेंद्र) घरी जायचे आहे, ज्याची ती उत्सुकतेने वाट बघत आहे. आनंद-उत्साह-उत्सुकता-excitement असेल तेव्हा स्वर कसा वर खाली होईल, त्याचा विचार करून राहुल देव बर्मन यानी हे गाणें केले असावे असे मला वाटते.  हाच विचार करून काही वाद्यावर offbeat स्वर वाजतात.  आशा भोसले यानी तो अल्लड़पणा, ते स्वरांचे हिंदोळे फार लिलया आणि प्रभुत्वाने ऐकवले आहेत.  गुलजार त्यांच्या गाण्यात (नृत्याचा प्रसंग नसेल तेव्हा) कोरियोग्राफर वापरत नसत.  पण या गाण्यात त्यानी हेमामालिनीला विनंती केली आणि हेमाने ते केलेही.

पंडित शिवकुमार शर्मा यानी वाजवलेल्या इराणी संतुरने गाणें सुरु होते, व्हायोलीन, बासरी वाजते. बिट आणि ऑफबीटचे कमालीचे मिश्रण. काय करू आणि काय नको असे झाले की असेच काहीतरी ऑफबीट होते..ताल धरून गाणे ऐकले आणि आपण संतूर वाजवत आहोत अशी कल्पना केली की यात ऑफबीटची कमाल काय आहे हे समजते.

घर जायेगी तर जायेगी
हो डोलियां चढ़ जायेगी
मेहेंदी लगायके रे काजल सजायके रे
दुल्हनिया मर जायेगी
s s s दुल्हनिया मर जायेगी

बासरी, मादल, संतुर....
प्रत्येक शब्दात स्वरातील चढ़ उतार ऐकले की हे गाणे आशा भोसले यांच्यासाठीच केले असावे असे वाटते.  एकदा अंतऱ्याची पहिली ओळ म्हणुन बघा, खास बात काय आहे याची कल्पना येते.  मधले पॉझेस श्रवणीय. 

धीरे धीरे लेके चलना आंगन से निकलना
कोई देखे ना दुल्हन को गली में
हो अँखियां झुकाये हुए घुंघटा गिराये हुए
मुखड़ा छुपाये हुए चली मैं
जायेगी घर जायेगी तर जायेगी
हो घर जायेगी

पहिल्या 3 ओळी नंतर, "मुखडा छुपाये हुए चली मैं" किंवा दुसऱ्या कडव्यात "मैने जाने कैसे सुना था" ही ओळ म्हणजे पँचमका कमाल.  मुखड्यानंतर ऊंच भरारी घेणे जितके अवघड तितकेच perfect landing ही अवघड, ती किमया आर डी ने लिलया केली आहे. 

व्हायोलीन, बासरी, गिटार, संतुर....यातल्या वादनाला दुःखाची झालर का आहे ते बघताना समजतय.

मेहंदी मेहंदी खेली थी मैं तेरी ही सहेली थी मैं
तूने तो कुसुम को चुना था
हो तूने मेरा नाम कभी आँखों से बुलाया नहीं
मैंने जाने कैसे सुना था
जायेगी घर जायेगी ला ला ला
हो घर जायेगी

या शेवटच्या कडव्यात तिची व्यथा आणि सिनेमातल्या कुसुमची कथा सांगीतली आहे.  हेमामालिनीने ही भूमिका समरसुन केली आहे.  मला ती दिग्दर्शकाची अभिनेत्री वाटते.  या सिनेमात तिचे डोळे, देहबोली बोलते.  दुसऱ्या दिवशी तिचे "घर जाएगी" स्वप्न पूर्ण होत नाही.  पण आशा सुटत नाही.  एकदा नायिका मैत्रिणी बरोबर आणि "नायका"च्या मुलाला बरोबर घेऊन नदीवर जातात.  नायिकेची मैत्रीण फरीदा जलालच्या तोंडी हे गाणें आहे (आणि हेमाला हमिंग).  फरीदा जलाल ही फार उत्तम अभिनेत्री आहे पण तिच्या वकुबाला न्याय देणारा रोल फार उशिरा मिळाला... मम्मो मधें. अन्यथा तिने जेवढे काम मिळाले त्यात छाप सोडली आहे...मजबूर, बॉबी, खुशबू. 



नदीकाठी असलेले हे गाणें घागरीवर वाजवलेल्या बोलानी सुरु होते. पंचम का कमाल....प्रसंगाप्रमाणे संगीत, वाद्ये.

बेचारा दिल क्या करे
सावन जले भादों जले
दो पल की राह नहीं,
इक पल रुके इक पल चले

भादो जले...आशा भोसले यानी ज्या वेगवेगळ्या पद्धतीने गायले आहे ते परत ऐकण्यासारखे.  आशा  भोसले यांच्या दोन्ही गाण्यात आवाज वेगवेगळा लावलाय, कमाल !!

गाँव गाँव में, घूमे रे जोगी,
रोगी चंगे करे, मेरे ही मन का,
तड़प ना जाने, हाथ ना धरे

तेरे वास्ते, लाखों रास्ते
तू जहाँ भी चले, मेरे लिये है
तेरी ही राहें, तू जो साथ दे

बेचारा...




जितेंद्रने एक चांगले केले, खुशबू, किनारा, परिचय सारख्या सिनेमाची निर्मिती केली.  या सिनेमाचा निर्माता कोण तर प्रसन्नकपूर म्हणजे जितेंद्रचा भाऊ, एकूण काय ताटातले वाटीत किंवा वाटीतले ताटात !! दिग्दर्शक गुलजार यांना स्वातंत्र्य असले तरी परिचय सिनेमातील त्याची एंट्री (मुसाफिर हूं यारो) ही टांग्यातुन म्हणजे त्याला कमी दर्जाचे वाटले, त्या मास्तरांची एंट्री विमानातून व्हावी अशी मागणी जितेंद्र ने केली, गुलजार यांना पटवून द्यावे लागले की टांगा कसा कथेला धरून आहे.  खुशबूच्या शूटिंगसाठी मेकअप करून आलेल्या हेमामालिनीला गुलजार यानी परत पाठवले आणि मेकअप काढून साधी कॉटनची साड़ी नेसायला सांगितले.  हेमा तयार नव्हती, तिची समजूत काढावी लागली.  परिचयच्या षूटिंगच्या वेळेस जितेंद्र म्हणाला "बिती ना बिताई रैना" बोअरिंग गाणें आहे, लोक उठून जातील, आपण काढून टाकू", गुलजार स्तंभित, अवाक, अचंबित वगैरे झाले.  तेवढ्यात जयाला घेऊन जाण्यासाठी अमिताभ  स्टूडियोमधे आला. गुलजार यानी अमिताभला हे गाणें बघायला सांगितले.  "बिती ना बिताई रैना" बघून अमिताभच्या डोळ्यात पाणी आले. त्याने गाण्याचे खुप कौतुक केले आणि  आपल्या सुदैवाने गाणें सिनेमात राहिले.  दिग्दर्शक होणे सोपे नाही, हेच खरे. 

चित्रपटाची नायिका कुसुम अभिमानी आहे तसेच नायकाची आई (दुर्गा खोटे) दुराभिमानी. नायकाला स्वतःचे मत नसते/तो व्यक्त होत नाही, दोन्हीकडे होयबा ची भूमिका करतो, शिवाय बरेच टिपिकल फिल्मी ग़ैरसमजाचे प्रसंगही आहेत.  इजाजत मधेसुद्धा नायकाला स्वतःचे मत नाही, हे विशेष. तर अशा नायकाला किनारा कसा मिळणार ? तो प्रवाहाप्रमाणे वहात जाणार...


माझी रे, माझी रे
अपना किनारा, नदियाँ की धारा है

या गाण्यात हलकासा तालवादयाचा वापर, बाटलीत फूंकर मारून काढलेला आवाज, किशोरचा दर्दभरा आवाज, व्हायोलीन, बासरी एकूणच प्रसंगाचे गांभीर्य अधोरेखीत करतो.

साहिलों पे बहने वाले कभी सुना तो होगा कहीं
कागजों की कश्तियों का कहीं किनारा होता नहीं
माझी रे, माझी रे
कोई किनारा जो किनारे से मिले वो अपना किनारा है
माझी रे...

किशोरकुमारने गाणी अशी गायली की गाताना फार काही गायन कौशल्य दाखवण्याचा आव आणला नाही, त्यामुळे आपण गुणगुणतो, गातो, गाणें आपलेसे होते.  पण तसे दर्दभरे -अभिनय गाणे सोपे नाही.

पानीयों में बह रहे हैं, कई किनारे टूटे हुये
रासतों में मिल गये हैं सभी सहारे छूटे हुये
कोई सहारा मझधारे में मिले जो अपना सहारा है
माझी रे...




तर अशा या खुशबू चित्रपटाची कथा सर्वोत्तम आहे का? नाही, पण त्याचे गुलजार यानी केलेले सादरीकरण एकदा बघण्यासारखे आहे हे नक्की.  असरानीला वेगळी भूमिका मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले.  मास्टर राजू म्हणजेच राजू श्रेष्ठ आपले आडनाव सार्थक ठरवतो.

दो नैनो में आंसू भरे है

बागेश्री, शिवरंजनी, झिंझोटीच्या छटा ऐकू येतात.  दोन वेगळे राग एकत्र आणून त्यांचे बेमालूम मिश्रण करणे हे राहुल देव बर्मन यांचे कौशल्य वादातीत होते.  याबद्दल राजू भारतन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंचम म्हणाले "धुन तयार होते, असे दोन वेगळे राग एकत्र आणून काहीतरी करूया असे काही ठरवून होत नसते, धुन तयार होते आणि नंतर तुम्ही लोक त्याचे असे analysis करत बसता".  मुखडा एका रागात असेल तरीही अंतऱ्याला वेगळा विचार करण्याचे आर. डी. चे कौशल्य अनोखे आहे.

सतार, तार-शहेनाई, व्हायब्रोफोन, तबला आणि लता मंगेशकर यांचा स्वर.  अप्रतीम.  या गाण्याची 2 व्हर्जन आहेत. एक वाद्यासह, एक कोणत्याही वाद्याशिवाय जे सिनेमात आहे.  सिनेमात असलेले गाणें लोरी गायल्याप्रमाणे खालच्या स्वरांत, हळूच कानात सांगितल्याप्रमाणे गायले आहे. लता मंगेशकर यानी निंदिया वेगवेगळ्या पद्धतीने गायले आहे

दो नैनों में आँसू भरे हैं निंदिया कैसे समाए
डूबे-डूबे आँखों में सपनों के साए
रात भर अपने हैं दिन में पराए
कैसे नैनों में निंदिया समाए
दो नैनों में आँसू भरे हैं
निंदिया कैसे समाए




कंदीलाच्या प्रकाशात सावल्यांचा खेळ प्रेक्षणीय आहे.

झूठे तेरे वादों पे बरस बिताए
ज़िंदगी तो काटी ये रात कट जाए
कैसे नैनों में निंदिया समाए...
दो नैनो में आँसू भरे हैं निंदिया कैसे समाए




डोळ्यात अश्रु असतील तर झोप येईल कशी ? गुलजार यांचे शब्द -(सपने) "रातभर अपने है, दिन में पराए",  आंसू "भरे" है, कैसे "समाए", .  जिंदगी तो "काटी" है, रात कट "जाए"...क़ाय हे भाषेचे हे वैविध्य

खरंच... खुशबू--गुलजार !!!


सुहास किर्लोस्कर



Comments

  1. छानच लिहिलंय। खूप मस्त।

    ReplyDelete
  2. वाचता वाचता मन हिंदोळत होते, हेलावत होते व डोळ्यांत पाणी येत होते.. खुशबू कळायला त्यात तादात्म्य व्हावे लागते. गुलजार कळायला मन व विचार हळवं व्हावे लागते. सुहास, लेख खुशबूदार झाला आहे.. मस्तच..

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  4. वाचता वाचता मन हिंदोळत होते, हेलावत होते व डोळ्यांत पाणी येत होते.. खुशबू कळायला त्यात तादात्म्य व्हावे लागते. गुलजार कळायला मन व विचार हळवं व्हावे लागते. सुहास, लेख खुशबूदार झाला आहे.. मस्तच..

    ReplyDelete
  5. मस्त ! खूप सुंदर लिहीलंय ! निखळ आनंद !

    ReplyDelete
  6. गुलजारजीनी पंचमदा ना घेऊन जितेंद्र हेमा कडून घोटवून काम करून घेतले आहे हे निश्चित च जाणवते. खुशबू पुन्हा पाहिल्याचा प्रगल्भ अनुभव मिळाला. घन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास